ढालसावंगी शेतकऱ्याच्या गोठ्याला मध्यरात्री आग; तीन जनावरे व ९० कोंबड्यांचा राखरांगोळींत मृत्यू!

गुन्हे व अपघात (क्राईम)

धाड (गावोगावी महाराष्ट्र न्युज ) — बुलडाणा तालुक्यातील ढालसावंगी गावात रविवारी (दि. १३ ऑक्टोबर) मध्यरात्री भीषण आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. या आगीत तीन जनावरे आणि तब्बल ९० कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाला असून, शेतीसाहित्य आणि यंत्रसामग्री जळून खाक झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी तुळशीराम खारडे यांच्या गट क्र. २७ मधील शेतातील गोठ्यात ही आग लागली. मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या या आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. आग इतकी भीषण होती की, गोठ्यातील एक बैल, एक गाय, एक गोन्हा तसेच तब्बल ९० कोंबड्या जिवंत जळून खाक झाल्या.
याशिवाय, दोन फवारणी पंप, दोन स्प्रिंकलर संच, एक मिनी स्प्रिंकलर संच, टीनपत्रे, शेती औजारे, वैरण आणि टोकण पेरणी यंत्र अशा सर्व वस्तूही आगीत जळून खाक झाल्या.
घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी, तलाठी तसेच धाड पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पाहणी करून पंचनामा केला.
या आगीत सर्वस्व गमावलेल्या शेतकरी शिवाजी खारडे यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *